Tuesday, December 23, 2014

असंच सुचलं म्हणून !

बरसणाऱ्या पावसाला पाहुन तुम्ही मनातनं भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका, हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत. पण अजूनही वेळ गेली नाहीये. बाहेर धो धो पाऊस बरसतोय, तो नेहमीसाठी असणार नाहीये. भिरकावून द्या ती छत्री आणि रेनकोट! आणि भिजून चिंब व्हा. ताण तणावाने काळवंडलेल्या, अदृश्य सुरकुतत्यांमागे लपत चाललेल्या चेहऱ्यावर झेला ते चमकते तुषार. गात्रागात्रामध्ये भिनू द्या तो थंडावा. निराशेची, असमाधानाची , काळजीची आवरणे वाहवून जाऊ द्या त्या ठिबकत्या अमृतात. चाखून पहा ती अवीट गोडी निर्मळ पाण्याची. पायातले ते पाश तोडून टाका. खोटे मुखवटे फाडून फेकून द्या. बेधुंद होऊन निरागस लहान मुलांसारखे नाचा. नाचताना तुमच्याकडे रोखलेल्या, कुत्सित हसणाऱ्या त्या नजरांची कीव करा. आयुष्याचा हा महोत्सव बेभानपणे साजरा करा.
ढगांकडून गडगडाटी हसणं शिका. विजेकडून तिचं लखलखणं शिकून घ्या. डोळे दिपून जातील सगळ्यांचे ,असं जगा. वाहत्या खळखळत्या पाण्याचा झरा व्हा, डबक्यासारखे साचून राहू नका. मनातलं साचलेलं सगळं वाहू द्या त्या झऱ्यासारखं. भन्नाट वाऱ्यावर मनाला डुलू द्या. त्याच्यासारखं गतिमान व्हा, आणि वेळ आली तर हळुवार फुंकर बनायला हि मागे पुढे बघू नका. ओल्या मातीचा गंध भरभरून लुटा. श्वासांमध्ये साठवून ठेवा त्याला. आयुष्यभर पुरणार तर नाहीचये तो गंध. पण हा क्षण सुद्धा परत नाही येणार आहे. हा पाउस पण नेहमीसाठी असाच मेहेरबान नसणार आहे. भिजणं रोज उद्यावर टाकत राहिलात तर एक दिवस तो उद्याचा दिवस पण नसणार आहे.
चिंब व्हा !!!

No comments:

Post a Comment

marathiblogs